Wednesday, 14 September 2011

सोनसखे....

मैत्रीण... कधी ती आपली आई असते पुढच्या क्षणाला आपली मुलगी... घटकेत आधार देणारी असते, तर घटकेत मागणारी! कधी खूप हवी हवीशी कधी अगदी नक्को वाटणारी... 
माझ्या आयुष्यात मला मैत्रिणी फक्त बरोबरीच्या नाही मिळाल्या, कधी आई, कधी बहिणी, कधी आजी, कधी आत्या तर कधी मामीने माझ्या मैत्रिणी झाल्या. खरं तर हि कविता, इथे नाव नसताना ज्या ज्या माझ्यावर हक्काने चिडून भांडतील अशा सगळ्या मैत्रिणींसाठी... 

कधी सडा सुगंधी तू पारिजातकाचा, 
कधी कळी अबोलीची नवखी ग...
सदाफुली तू, हसरी , भाबडी, निरागस,
दरवेळी नवी, माझी सोनसखी ग!! 

कधी थंडीचं होतेस ऊन कोवळं,
कधी असतेस उन्हातली शांत दुपार...
कधी असतेस नुसतंच भरलेलं आभाळ,
कधी असतेस पावसाची सर धुव्वाधार!! 

कधी देतेस दिशा , असताना भरकटत, 
अन त्याच प्रवासात देतेस साथ...
कधी नकळत जातेस हरवूनही अशीच,
मग सापडताच नाहीस घालूनही साद !!

हवासा वाटल्यावर मला आधार भक्कम,
घ्यायला मग सांभाळायला धावून येई...
कधी शोधात राहतेस तूच आडोसा,
होतेस नाजुकशी हळवी जाई जुई!! 

कधी माझाच होतो भास तुझ्यात, 
कधी उमजूनही भासतेस अनोळखी ग ...
जितकी माझ्यासारखी कधी तितकीच निराळी  ,
दरवेळी नवी, माझी सोनसखी ग!! 

हवं आहे

कधी कधी नक्की काय हवंय ते कळायच्या आधीच, ते हातातून निसटून जातं... आणि मग स्वतःनीच स्वतःला सावरायची वेळ येते... पण तीही वेळ शाश्वत नसतेच... कोणीतरी म्हणून गेलाय "वेळ चांगली असो किवा वाईट, सरतेच!!" अशाच एका दृष्टिकोनासाठी... 
 
मुठभर माती हवी आहे,
स्वप्नं रुजत घालायला
थोडेसे ढग हवे आहेत,
हलकेच त्यांवर बरसायला

हवा आहे कुपिभर सुवास,
कोवळ्या स्वप्नांवर शिंपडायला
हवे आहेत ओंजळभर रंग,
नवखी स्वप्न रंगवायला

मग हवे चिमुकले पंख,
स्वप्नांना उडू द्यायला
हवे आहेत पापणिभर अश्रू,
अस्तित्वाचं भान राखायला

हवा आहे मनभर ध्यास,
या स्वप्नांना पूर्ण करायला
आणि हवय खंबीर मन,
मोडलीच स्वप्न तर मला सावरायला