Wednesday, 14 September 2011

हवं आहे

कधी कधी नक्की काय हवंय ते कळायच्या आधीच, ते हातातून निसटून जातं... आणि मग स्वतःनीच स्वतःला सावरायची वेळ येते... पण तीही वेळ शाश्वत नसतेच... कोणीतरी म्हणून गेलाय "वेळ चांगली असो किवा वाईट, सरतेच!!" अशाच एका दृष्टिकोनासाठी... 
 
मुठभर माती हवी आहे,
स्वप्नं रुजत घालायला
थोडेसे ढग हवे आहेत,
हलकेच त्यांवर बरसायला

हवा आहे कुपिभर सुवास,
कोवळ्या स्वप्नांवर शिंपडायला
हवे आहेत ओंजळभर रंग,
नवखी स्वप्न रंगवायला

मग हवे चिमुकले पंख,
स्वप्नांना उडू द्यायला
हवे आहेत पापणिभर अश्रू,
अस्तित्वाचं भान राखायला

हवा आहे मनभर ध्यास,
या स्वप्नांना पूर्ण करायला
आणि हवय खंबीर मन,
मोडलीच स्वप्न तर मला सावरायला

1 comment: